Saturday, April 8, 2017

विपश्यना आणि मी (मराठी)

विपश्यना आणि मी


लहानपणापासूनच काही कुतूहलात्मक प्रश्न कायम पडायचे – मला साध्या साध्या गोष्टींचे वाईट का वाटते, राग का येतो, मलाच जास्त त्रास का होतो वगैरे. जशी जशी मी मोठी होत गेले त्यात आणखी काही प्रश्नांची भर पडली नातेसंबंधात इतका ताण तणाव का आहे,जवळच्या व्यक्तीचा वेळेआधीच मृत्यू व्हावा असे दु:ख आपल्या वाट्यालाच का आले वगैरे. प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रवास सुरु झाला. बरीच पुस्तके वाचली. बरेच वेगवेगळे मार्ग चाचपडून पहिले ...पण कुठेही निर्मळ मार्ग मिळत नव्हता.
कितीतरी वेळेला काही वाक्ये  परत परत समोर यायची :

  • “तुमच्या स्वतःच्या परवानगी शिवाय कोणीही तुम्हाला दुखवू शकत नाही.”
  • “आपले कर्म करत राहा, फळाची अपेक्षा करू नका, आणि जे फळ मिळेल ते प्रसाद मानून घ्या”.
  • “नातेसंबंध हा एक व्यवसाय नाही, जेथे आपण काही मिळेल म्हणून देतो, तो एक सुंदर अनुभव आहे जेथे तुम्ही देण्यावर फक्त प्रेम करता परतीची अपेक्षा न करता.”
  • “केवळ ती व्यक्ती सुशिक्षित आहे, जी जाणून घेते कि कसे शिकायचे आणि स्व:तला कसे बदलायचे.”
  • “आनंदी रहाण्यासाठी कधीही आपल्या भावनांना अश्रूंची आणि आपल्या रागाला शब्दाची मदत देवू नका.”
  • “कधी कधी माफी मागितली म्हणजे आपण चुकीचे आहोत आणि इतर योग्य आहेत असा अर्थ होत नाही..तर आपल्या स्वत:च्या अहंकारा पेक्षा नातेसंबंधाना आपण जास्त मोल देतो असा होतो.”
  • “अगदी साधे आहे आनंदी राहणे...अवघड आहे ते साधे राहणे.”


पण त्यासाठी नक्की काय करायचे कळत नव्हते. शोधता शोधता मग काही अगदी जवळची खास माणसे भेटत राहिली ज्यांनी एक खात्रीशीर मार्ग वेळोवेळी दाखवला - विपश्यना! त्यांनी तो मार्ग “जगला” होता. एक दादा जो ही साधना खूप वर्षे करत होता आणि खूप प्रगल्भ झाला होता, एक भाभी ज्या अचानक नवरा वारला तरी खंबीर होत्या, एक मित्र ज्याने स्वभावात चांगला बदल अनुभवला होता, माझी आज्जी जिने धर्माच्या पलिकडे जाऊन ही विद्या शिकली होती. या सर्वांकडून प्रेरणा मिळाली. विपश्यना शिबिराला जायचे असे ठाम केले.

विपश्यनेबद्दल माहिती घेतली. विपश्यना एक ध्यानाचा प्रकार आहे. याचा नियमित अभ्यास केल्याने मन शांत, समतोल, संयमी, सुखी व दयाळू/कृपाळू होते. गौतम बुद्धाने ही विद्या पूर्वी भारतात शिकवली, आता ती पुन्हा आचार्य श्री. सत्यनारायण गोयंका यांच्या माध्यमातून,देशोदेशी असलेल्या केंद्रातून, फक्त विपश्यना केलेल्या लोकांच्या दानातून, कसलाही भेदभाव न करता, सर्व लोकांना दिली जाते. मुख्य म्हणजे या मार्गाला प्रसिद्धी वा पैशाची हाव नव्हती! सगळ्या केंद्रांमध्ये एकाच प्रकारे कार्यक्रम असतो. शिबिरासाठी १२ दिवस हवेत. पहिल्या दिवशी दुपारी पोहोचायचे, १० दिवस विपश्यनेचे धडे घ्यायचे, १२ व्या दिवशी सकाळी परत निघायचे. मौन पाळावे लागते. जगाशी संपर्क नसतो. या पूर्ण काळामध्ये तुम्हाला एक ठराविक उपक्रम दिला जातो त्यानुसार अंमलबजावणी करायची. हा वैयक्तिक अनुभवाचा अभ्यास असल्याने अंतर्मुखी होणे, सूचना व नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे. बोलायची गरज नसते कारण तुमची सर्व व्यवस्था चोख असते. गरज पडलीच तर सहाय्यक आचार्य शंका समाधान करतात व धम्मसेवक/धम्मसेविका मदत करतात. कार्यक्रमात योग्य प्रकारे प्रशिक्षण दिले जाते. दिवस पहाटे सुरु होतो, ध्यानाचे १ ते २ तासाचे दिवसभर कार्यक्रम असतात व निर्देशानुसार काम करायचे असते. सगळे पटले. पूरक अशा तारखा व स्थळ बघून Online अर्ज केला. सफलतेचा दृढनिश्चय करून शिबिरात रुजू झाले!



शिबिरात तीन पायऱ्या सांगितल्या. शील समाधी प्रज्ञा.

शील
“शील” म्हणजे नैतिक वर्तणूक करायची, शरीराने किंवा मनाने दुसऱ्या कोणाचीही सुख-शांती भंग होईल असे काम करायचे नाही.

समाधी
पहिले ४ दिवस मन शांत, तीक्ष्ण व एकाग्र करायचे म्हणजेच आनापान. या वेळी फक्त नाकाच्या दाराशी श्वास अनुभवत राहायचे. अगदी अचंबित करणारे ते ४ दिवस होते. आपले मन किती वेगाने, कुठे कुठे, कधीही, कसे जाते याचा प्रत्यय आला. काम करत करत प्रगती झाली. काही काही वेळेला गुरुजींचा आवाज थोडा वेगळा वाटायचा, काही साधिका बोलायच्या,काही गोष्टी अपेक्षेप्रमाणे नव्हत्या, काही शारीरिक त्रास जाणवले, पण त्याला महत्व दिले नाही. कारण मनापासून ही विद्या शिकायची मला गरज वाटली होती. मला स्व:तला बदलायचे होते– सकारात्मक!

प्रज्ञा
पुढचा टप्पा म्हणजे विपश्यना. ती कशी करायची, का करायची, नक्की काय करायचे, काय करायचे नाही, त्याच्या मागचा अर्थ काय हे सगळे दररोज अनुभवले. गुरुजींच्या रात्रीच्या प्रवचनामधून कळत गेले. आपल्या बाबतीत ह्या क्षणाचे जे सत्य आहे, जसे आहे, ठीक त्या प्रकारे, तसेच, त्याच्या खऱ्या स्वरूपामध्ये स्वभावामध्ये पहाणे, समजणे, हीच विपश्यना.  विपश्यनासाधना दुःखाची मूळ तीन कारणे दूर करते – आसक्ती (पूर्वीच्या काळी याला राग म्हणत), द्वेष आणि अविद्या. आपल्या दुःखाचे कारण आतमध्येच आहे, ते म्हणजे सुखद तसेच दुःखद संवेदनांना दिलेली आंधळी प्रतिक्रिया! विपश्यना तटस्थपणे, काही प्रतिक्रिया न करता, जे जसे आहे तसे स्वीकारायला शिकवते. प्रकृतीचे नियम समजून घ्यायला शिकवते. शेवटी मैत्री भावना, सगळ्यांसाठी प्रार्थना शिकवली. १० दिवस कसे गेले कळलेच नाही!



शिबीर एकंदर खूप छान झाले. मी शोधत होते त्या प्रश्नात एक उत्तर मला  मिळाले होते की माझे वर्तमान जीवन समृद्ध करायचा हा एक खूप चांगला मार्ग आहे.  मनात एक वेगळीच शांतता आणि समाधान होते. इतकी गहन विद्या आणि ती ज्या प्रकारे दिली आहे- काही डामडौल न करता, त्याचा खूप आदर वाटला. सगळे कसे तर्कशुद्ध वाटले आणि पटले.   बऱ्याच गोष्टींचा अर्थ पहिल्यांदाच कळला. आंधळ्या प्रतिक्रियेऐवजी सजग प्रतिसाद देता येऊ शकतो हे समजले. जे प्रश्न सार्वजनिक आहेत त्या प्रश्नांना विपश्यना हा सार्वजनिक, वैश्विक आणि प्रत्येक धर्माचे सार असलेला व्यवहार्य उपाय आहे हे लक्षात आले. अनेक शिबीरे केलेल्या लोकांबरोबर गप्पा मारून मुळापासून स्वभाव बदलू शकतो याची प्रचीती आली. काय साधना करायची हे उमगले. गुरुजी, धर्म सेवक-सेविका आणि असंख्य दानशूर लोकांना मनापासून शतश: धन्यवाद दिले. आणि मी कृतज्ञतेने नतमस्तक झाले! एक बीज पेरले गेले होते, त्याला रोज साधना करून खतपाणी घालायचे ठरवून मी खूप समाधानाने परतले.

या पहिल्या शिबिरानंतर माझे मला जाणवायचे कि पूर्वी मी १० गोष्टींवर चिडत असेन तर आता ८ झाल्या, तसेच कुढणे, उदास होणे, रडणे, दु:खी होणे थोडे थोडे कमी झाले. माया दाखवणे, सहज जगणे, दिलखुलास आनंद घेणे जमू लागले. ऑफिस मधेही माझ्या व्यवहारात चांगले बदल होत होते. मनाचा समतोल राहू शकत होता. माझ्यात अनेक सकारात्मक बदल होत गेले. हळू हळू!
रोजची साधना काही कित्येक वर्षे जमली नाही. काही काळाने पुन्हा पुन्हा शिबिरे केली. दर वेळी वेगळे, चांगले अनुभव आले, गहनता कळली. हा वृक्ष हळू हळू वाढत राहिला. माझी आशावादी मनोवृत्ती आणि वर्तमान क्षणात राहण्याची मिळणारी झलक मला या मार्गावर पुढे जाण्यासाठी प्रवृत्त करत होत्या. शंका, अडथळे येत होते, पण मार्गदर्शन मिळत गेले...प्रवास चालू राहिला!

या प्रवासात काही थोडे लोक असे भेटले ज्यांना काही कळलेलेच नाही! वैयक्तिक अभ्यासात कुवतीप्रमाणे ज्ञान मिळते. इथेही तसेच होत असावे....म्हणून अशा लोकांकडे दुर्लक्ष केले. प्रत्येक ठिकाणी काही त्रुटी असतात तशा बाकी लोकांमुळे या शिबिरात येवू शकतात, पण साधनेचा मतितार्थ समजून घेतला आणि त्या नुसार सराव केल्यास सकारात्मक बदल घडतो हे नक्की! या प्रवासात असे असंख्य लोक भेटले ज्यांनी ही साधना अनेक वर्षे केली आहे आणि त्यांना ती समजली आहे. असे लोक दुसऱ्यांच्या दुःखाप्रती अधिक संवेदनशील असतात, तसेच व्याकुळ न होता त्यांच्या दुःखांच्या निराकरणासाठी मैत्री, करुणा आणि समतापूर्ण चित्तासमवेत ते हर प्रकारे प्रयत्नशील असतात. त्या लोकांचे बोलणे, वागणे, व्यवहार बघून खऱ्या अर्थाने माणुसकी दिसते,विश्वास वाढतो, मनोबल मिळते.

ध्यानाला अनेक लोक दूर ठेवतात. त्याची गरज मला नाही हा कित्येकांचा गैरसमज असतो. पण तसे नाही. प्रत्येकाला एक अधिक चांगले जीवन जगता येते, स्वत:साठी आणि इतरांसाठी सुद्धा...तेही ”आत्तापासून”. या गोष्टी शेवटच्या टप्प्यासाठी नाहीत. या विद्येमुळे आपले कर्म आपोआप सुधारेल. समता वाढेल. कठीण प्रसंगांना व्याकुळ न होता योग्य प्रकारे सामोरे जाता येईल. बाह्य परिस्थिती बदलत नसते, पण  मन संतुलित झाल्याने आपण डोळस प्रतिक्रिया देतो.

जसे आपण रोज शरीरासाठी खातो-कसरत करतो, बुद्धीच्या चालनेसाठी वाचन मनन करतो तसेच रोज मनाचा व्यायाम जरुरी आहे आणि मला तरी तो विपश्यना साधनेमध्ये सापडला. विपश्यना एक अनुभवात्मक आणि शुद्ध, उत्तम मार्ग आहे. पण मार्ग कठीण आहे. या मार्गावर कष्ट आणि चिकाटी महत्वाची आहे. नियमित अभ्यास लागतो. कुटुंबाची चांगली साथ सोबत आहे, अनेकांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन आहे. समतोल वृत्ती व सेवाभावासह मानवता धर्म जोपासायचा आहे. या मार्गावर बरेच पल्ले आहेत. पुढे पुढे टप्पे गाठत मला प्रगती करत रहायची आहे! हा अनुभव वाचून तुम्हाला शिबीर करायची ओढ लागो हीच सदिच्छा!

भवतु सब्ब मंगलम - सर्वांचे मंगल होवो!

अधिक माहिती:
लहान मुलांसाठी ८ ते १८ वय विपश्यना केंद्रांवर ध्यान – आनापान साधना शिबिरे असतात.
http://www.children.dhamma.org/en/  इथे काही videos आहेत, ते जरूर बघा. मुलांनी रोज १० मिनिटे सकाळ संध्याकाळ “आनापान” केल्याने त्यांच्यात खूप उत्तम बदल होतात.

विपश्यनेसाठी १८ वर्षाच्या पुढे १० दिवसाच्या विपश्यना शिबिरामध्ये प्रवेश दिला जातो. किशोरवयीन
मुलांसाठी ७ दिवसाचे शिबीर असते. योग्य वयात हे ज्ञान घेण्यासारखे दुसरे उच्च शिक्षण नाही!
http://www.dhamma.org
http://www.children.dhamma.org/en/
http://www.dhamma.org/mr/about/art
http://www.dhamma.org/mr/courses/search
http://www.vridhamma.org/VRI-Introduction
http://www.vridhamma.org/Question-and-Answers

अनेक शुभकामना!
ConsciousMe

No comments:

Post a Comment